सातारा / प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. संमेलनात प्रकाशन कट्टा याव्दारे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रकाशन कटट्यावर प्रकाशनासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
पत्रकात, साता-यात तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साता-याच्या लौकिकाला साजेसे होण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. या संमेलनात कवी कट्टा, गझल कट्टा तसेच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचतंर्गत प्रकाशन कट्टा व्दारे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रकाशन कटट्यावर पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे प्रकाशन कट्ट्यावर प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती कुठेही प्रकाशित झालेली नसावी. प्रकाशित करावयाच्या पुस्तकाबरोबर लेखकाचे नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल आयडी, प्रकाशकाचे नाव, फोन नंबर व पुस्तकाचा थोडक्यात परिचय पाठवावा. प्रकाशित करावयाच्या पुस्तकाच्या २ प्रति ( १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ) ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा द्वारा जनता सहकारी बँक, सातारा, १७९, भवानी पेठ, सातारा ४१५००२ या पत्त्यावर पाठवाव्यात. प्रकाशन कटटयावर कोणती पुस्तके प्रकाशित करायची याचा अंतिम निर्णय निवड समिती घेईल. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ५ पुस्तके कळविलेल्या तारखेस व वेळेस पॅकींग करून स्वत: घेऊन यावयाची आहेत. प्रकाशनासाठी पुस्तक निवडल्याचे लेखकांना इ-मेल आयडी, दूरध्वनीद्वारे कळवले जाईल, अशी माहिती प्रकाशन कट्टा प्रमुख शिरीष चिटणीस, मुख्य समन्वयक घन:श्याम पाटील, सहसमन्वयक श्रीराम नानल, सहसमन्वयक विलास काळे यांनी दिली.
तुमचे मत, प्रतिक्रिया, संपर्कासाठी उजव्या हाताकडील व्हॉटसअप बटनावर क्लिक करा

