सातारा, दि.16- पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरिक्षकाचा दर्जा असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु गाडीत पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यावर त्याला गाडीसहीत सोडून देण्यात आल्याचा प्रकार साताऱ्यात घडला आहे. संबधित जखमी पादचाऱ्याचा मात्र या आपघातात मृत्यू झाला आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याच्या हद्दीत डीमार्टसमोर काळ्या रंगाची इनोव्हा कारने (MH-09-EE-0108) एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. गाडीच्या धडकेने पादचारी खूप दूरपर्यंत उडाला आणि या अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ही कार तिथे न थांबता निघून गेली. स्थानिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर गाडीचा पाठलाग केला. स्थानिकांनी ही कार आनेवाडी टोल नाक्याजवळ अडवली. टोलनाक्याजवळ पकडलेली कार आणि चालकाला स्थानिकांनी भुईंज पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडीत विशेष पोलीस महानिरिक्षक असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस हतबल झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात कोणत्याही नोंदी न करताच ही इनोव्हा गाडी सोडून दिली. या प्रकरणाबाबत पोलिसांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. गाडीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कौसर खलिद असे आहे. या आपघातातील जखमी पादचारी दत्तात्रय शेवते यांचा मृत्यू झाला असून या आपघाताची नोंदही पोलीस ठाण्यात आद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.
सातारा जिल्हा
पादचाऱ्याला उडवून पळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गाडी पकडली
आयजी आहेत समजताच सोडून दिली


