सातारा, दि. 18 – माढा मतदारसंघात आघाडी आणि युतीकडूनही उमेदवारीचा तिढा सुटत नसताना आता या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लढावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसेना नेते किसनराव नलवडे यांनी केली आहे. युतीच्या जागा वाटपात माढ्याची जागा भाजपच्या वाट्याला गेली असल्यामुळे या जागेवरून मोदी यांनीच लढावे, अशी इच्छा नलवडे यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्यातून लढले तर मतदारसंघासह महाराष्ट्राचा विकास अधिक झपाट्याने होईल तसेच माढा मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. परिणामी माढा मतदारसंघात असलेल्या माण तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये पडणारा दुष्काळ कायमचा दूर होणार आहे, असे मत नलवडे यांनी व्यक्त केले.
नलवडे सातारा जिल्हा शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत. माण तालुक्यात शिवसेनेच्या संघटन बांधणीत योगदान राहिले आहे. तसेच नलवडे यांच्या पत्नींनी माण तालुक्यात किंगमेकर म्हणून ओळख निर्माण केलेले दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या पत्नींचा जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत पराभव केला होता. दरम्यान, महाराष्ट्रातून आणि पवारांनी माघार घेतलेल्या माढा मतदारसंघातून मोदींनी निवडणूक लढविण्याची मागणी प्रथमच झाली असून याबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजकीय
मोदींनी माढ्यातून लढावे; शिवसेना नेते किसनराव नलवडे यांची मागणी


