NEWS & EVENTS

राजकीय

ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा - प्रकाश आंबेडकर

माझा लढा समोरच्या हुकूमशहासोबत आहे. त्यामुळे काही बाबतीत मला सुद्धा हुकूमशहासारखे वागावे लागेल"

19Prakash-Ambedkar.jpg

अकोला, दि. 6- सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सोशल मीडियावरही नेत्यांना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा ट्रोलर्सना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिला आहे. लोकशाहीमध्ये टीका करणारा हा प्रामाणिक असावा, सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढण्याशिवाय पर्याय नसतो. सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढा, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधला. ट्रोलर्सविषयी आंबेडकर म्हणाले, प्रसारमाध्यमांमधून माझ्यावर टीका करणाऱ्यांवर माझा राग नाही. राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांबद्दल आता ठोकशाहीची भूमिका असणार आहे. सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढा. मला ट्रोल करणाऱ्यांना कार्यकर्ते पाहून घेतील. माझा लढा समोरच्या हुकूमशहासोबत आहे. त्यामुळे काही बाबतीत मला सुद्धा हुकूमशहासारखे वागावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबतही भाष्य केले. हवाई दलाने पाकिस्तानात दहशतवाद्यांना लक्ष्य करणारा हवाई हल्ला केला. परंतु या कारवाई संदर्भात संभ्रम निर्माण झाला असून सैन्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत छायाचित्रांसह संबंधित पुरावे प्रसिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली.

केवळ हल्ला करून आम्ही सज्ज आहोत, हेच दाखवायचा प्रयत्न सरकारने केला असेल तर त्याची काहीच गरज नव्हती. यापूर्वीही तसे ते दाखवून देण्यात आले आहे. हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, हे मोजण्याचे काम वायुसेनेचे नाही, असे विधान वायुदलप्रमुख धनोआ यांनी करून केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. हवाई दलाने आपले काम केले, आता सरकारने या हल्ल्यासंदर्भात जबाबदारीने पुरावे देण्याची गरज आहे, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.